पाणीपुरवठा तक्रार निवारण ‘इंटरनेट’वरून

पाणीटंचाई असो किंवा नळपाणी योजना बंद झाल्याची घटना, वारंवार तक्रार देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार ग्रामीण भागातील नागरिकांकडून केली जाते. त्यामुळे राज्यशासनाने पाणी पुरवठा विषयक तक्रारीच्या निवारणासाठी “ई-पाणी’ या नावाने थेट इंटरनेटद्वारे तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. 

केंद्र शासनाच्या सूचनांनुसार ई-गव्हर्नन्स व कामकाजामध्ये पारदर्शकता या बाबींना प्राधान्य देऊन महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री लक्ष्मणराव ढोबळे व प्रधान सचिव मालिनी शंकर यांच्या पुढाकाराने 1 मे 2000 पासून सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू केली. http://epani.maharashtra.gov.in/epani/ या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध आहे. या पाणी पुरवठा विभागाच्या http://www.mahawssd.gov.in या संकेत स्थळावर ही लिंक आहे. सद्यःस्थितीत http://gms.maharashtra.gov.in/EPaniDemo/ या संकेतस्थळावर तक्रार नोंदविणे शक्‍य होईल.

पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली ही सुविधा उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्येही सुरू होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हे या तक्रार प्रणालीचे केंद्रस्थ अधिकारी म्हणून काम पाहतील. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा अथवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यापैकी कोणत्याही यंत्रणेकडे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असली तरीही प्राप्त झालेल्या तक्रारीचे निवारण होत आहे, हे पाहण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांची राहील. तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती संबंधित यंत्रणेकडे पाठवणे, झालेल्या उपाययोजनांनुसार प्रणाली अद्ययावत करणे इत्यादी कार्यवाही त्यांच्या कार्यालयामार्फत करण्यात येईल. प्राप्त झालेल्या तक्रारी, केलेली कार्यवाही, प्रलंबित तक्रारी इत्यादीबाबतची माहिती जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य अभियंता, आयुक्‍त, सहसचिव, सदस्य सचिव, प्रधान सचिव हे वरिष्ठ अधिकारी थेट इंटरनेटवर या प्रणालीवरून पाहू शकतील. 

तक्रारदार कोण?जिल्ह्यातील कार्यान्वित असलेल्या योजना बंद पडल्या किंवा त्यामध्ये दुरुस्तीचे काम निघाले तर ती तक्रार “ई-पाणी’ या वेबसाइटवर देता येणार.
Exit mobile version